★राज्यसेवा
2018 मध्ये मुलाखतीला
जाणाऱ्या सर्वांसाठी
....★
अभिनव बलुरे सर, उत्पादन शुल्क अधीक्षक (Excise SP)
मित्रांनो पहिल्या उत्तरतालिकेनुसार आपल्या सर्वांनाच मार्कांचा अंदाज आलेला आहे. काही दिवसांनी मुलाखत होऊन तुमच्यापैकी बरेच जण अंतिम यादीत झळकाल.
मात्र या दरम्यानच्या काळात अनेक संधीसाधू तुम्हाला गोड बोलतील, तुम्हाला मुलाखतीची तयारी करायला मदत करतो म्हणून तुम्हाला जवळ करतील, तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर तुमच्यावर उपकार करण्याचा प्रयत्न करतील.. मुलाखतीसाठी लागणाऱ्या गोष्टी घेऊन देतील, चांगल्या हॉटेल मध्ये जेवू घालतील.. आणि आपणही आंधळेपणाने त्यांच्या गोड बोलण्याला भाळतो आणि निवड झाल्यानंतर त्यांचे गुणगान करत महाराष्ट्रभर फिरतो..
पण मित्रांनो, आपल्या मनाला एक प्रश्न विचारा. जेव्हा आपण MPSC च्या तयारीला लागलो तेव्हा कुणी केली असती का हो आपल्याला अशी मदत? आपण कितीही परिस्थिती नाजूक आहे असं सांगितलं तरी टप्प्या टप्प्यात पूर्ण फीस भर असं सांगतील.
आपण या टप्प्यापर्यंत आलात याचं पूर्ण श्रेय तुम्ही मागील काही वर्षात घेतलेल्या कष्टांना आहे.. बालवाडीपासून आतापर्यंत तुमच्यासाठी खस्ता खाणाऱ्या तुमच्या आईवडिलांचं आहे..तुम्ही आतापर्यंत दाखवलेल्या तुमच्या संयमाला आहे.. मग हे श्रेय असं ऐनवेळी कुणाला का म्हणून द्यायचं?
त्यामुळं इथून पुढं 2 महिने कुणाकडून उपकार करून घेऊ नका... आर्थिक मदतीसाठी, डिनर पार्टीसाठी, पुढील प्रसिद्धीसाठी स्वतःला विकू नका.. मुळात तुमची मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व हे 2 महिन्यात कुणी घडवून देणारं नसतं... खरं तर तुम्ही नैसर्गिकपणे, प्रामाणिकपणे स्वतः तयारी केलीत तर मुलाखतीला चांगले गुण येण्याची संभावना जास्त आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील ज्यांनी अशा कोणाही बाजारूंची मदत न घेता मुलाखतीला टॉप केलेले आहे. अशीही ढीगभर उदाहरणे आहेत, ज्यांनी यांच्याच भरवशावर मुलाखतीची सर्व तयारी केली व मुलाखतीला खूप कमी गुण आले आणि त्यामुळे निवड न झाल्यानंतर अशांना या so called मार्गदर्शकांनी धीर देण्याचे तर सोडा, साधी ओळख पण दिली नाही.
जर तुम्हाला खरच मुलाखतीसाठी कुणाचा फायदा झाला असेल तर निवड झाल्यावर फक्त मुलाखतीसाठी फायदा झाला असं स्पष्ट सांगा.
तुमची निवड झाल्यावर तुमच्या भाषणातील शब्द नि शब्द महत्वाचा असतो. त्या शब्दावर विश्वास ठेवून खेड्यापाड्यातील हजारो मुलं थेट पुण्यात येतात.. आणि तुम्ही ज्या व्यक्तीच नाव घेतलं त्या माणसाकडे 70-80 हजार रूपये भरून ऍडमिशन घेतात.. ही सर्व अब्जावधीची उलाढाल आहे. आपण फक्त या अशा क्लास चालकांसाठी एक प्यादे आहोत..आज आपल्या नावाचा वापर करतील उद्या इतर कुणाच्या.
पटलं तर बघा...जमल्यास शेअर करा.
टीप :
अर्थात ही पोस्ट कुण्या व्यक्तिविरोधात नाहीये तर स्वकष्टाने मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांना जाळ्यात अडकवू पाहणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आहे.
अशा जाळ्यात ओढलेल्या यशवंताच्या मुलाखती आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांची कशी दिशाभूल करतात, याचा जवळून अनुभव घेतलाय. परिस्थिती नसताना कर्ज काढून क्लासची फी भरणारे पाहिलेत. तेव्हा विचार करायचो, पोटांना पीळ देऊन असे का करत असतील हे लोकं? तर त्याचे मूळ कारण आहे, निवड झालेल्या उमेदवारांची ही बेजबाबदार वागणूक. आपला वापर करून घेतला जातोय, एवढी साधी गोष्ट या भावी अधिकाऱ्यांना कळू नये का? हीच खरी खंत आहे. त्यासाठी हा खटाटोप. मला कल्पना आहे, या परिस्थितीमध्ये फार काही बदल होणार नाही. पण म्हणतात ना, काही मोठा बदल करायचा असेल तर सुरूवात स्वतःपासून करा.
तशी मी सुरूवात तर केलेलीच आहे.. बघूया काही सकारात्मक बदल होतोय का?
No comments:
Post a Comment